शरद पवारांनी मुलाखतीतून भाजपला टोला लगावल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी केलं खुलं ‘आव्हान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवार यांच्या ‘एक शरद सगळे गारद’ या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रदर्शित झाला. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. या खास मुलाखतीत शरद पवार यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. यामध्ये शरद पवार यांनी भाजपवर चौफेर टीका केली आहे. शरद पवार यांनी 105 जागांवरून टीका करताना म्हणाले की, शिवसेना सोबत नसती तर भाजपच्या 50 जागा निवडून आल्या असत्या. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी भाजपवर टीका केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना एक आव्हानही दिलं आहे. पवार साहेब तुम्ही वेगवेगळे लढला असता तर तुमच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या. लोकांना वाटत नाही की भाजपला सत्तेत दर्प आला आहे. माझं खुलं आव्हान आहे, चार पक्ष वेगवेगळे लढूया… पाहू कुणाच्या जागा जास्त निवडून येतात… कुणाची किती ताकद आहे बघू. गेल्या निवडणुकीत देखील आम्हाला सगळ्यात जास्त मतदान मिळालं होतं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

राजस्थानमध्ये घडत असलेल्या घटनेवरही पाटील यांनी भूमिका मांडली. त्या पक्षातील आमदारांना वा नेत्यांना आपला पक्ष कमकुवत वाटत असेल. त्यांच्या भविष्याबद्दल विश्वास द्यायला त्यांचा पक्ष कमी पडत असेल. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास असेल. त्यामुळे सचिन पायलट भाजपमध्ये आले की नाही, हे एक दोन दिवसांत स्पष्ट होईल, असे पाटील यांनी सांगितले.