बिहारमधील यशाबद्दल चंद्रकांत पाटलांनी फडणवीसांचे ‘या’ शब्दात केले कौतुक

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन –  अख्ख्या देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Election) जनतेने भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या आघाडीला स्पष्ट बहुमत देऊन विकासाच्या मुद्द्याला महत्त्व दिले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणाचे समर्थन केल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp Leader Chandrakant Patil) यांनी दिली आहे. तसेच बिहारच्या जबरदस्त यशाबद्दल मी पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करतो. त्यांनी बिहारमध्ये भाजप विजयी होण्यासाठी समर्पण भावनेने अपार मेहनत ( devendra-fadnavis-for-hard-work-in-bihar-election) केली, असेही त्यांनी म्हटले आहे.
बिहार विधानसभा निवडणूक, तसेच मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगण आदी राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे व जनतेचे अभिनंदन केले आहे. पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या कुशल संघटनात्मक नेतृत्वाखाली हे यश मिळाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बूथ पातळीपासून पक्षाच्या बळकटीसाठी देशभर राबवलेल्या व्यापक मोहिमेचा लाभ पक्षाला होत आहे, असेही ते म्हणाले. या निवडणुकीमध्ये भाजपने जिंकलेल्या जागांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भरघोस वाढ झाली आहे. प्रमुख पक्षांच्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत घटल्या असताना, भाजपचे यश अधिक उठून दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपच्या विजयाची परंपरा सर्व निवडणुकांत,कायम राहील : पाटील

पंतप्रधान नरेंद्र यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’, या सूत्रानुसार सर्व समाजाला सोबत घेऊन विकास करण्याचा आहे. त्यांच्या या विकासाच्या राजकारणाचे बिहारसोबतच देशभरातील ठिकठिकाणच्या जनतेने समर्थन केले आहे. करोनाच्या संकटात अनेक विकसित व श्रीमंत देश हतबल झाले असताना भारताने मोदींच्या नेतृत्वाखाली या महासाथीचा प्रभावी मुकाबला केला. केंद्र सरकारने गोरगरिबांना व स्थलांतरित कामगारांना मदत पोहोचवली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी देशभर प्रभावी सेवाकार्य केले आहे. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले आहे. या सर्वामुळे जनतेनं भाजपला पसंती दिल्याचे ते म्हणाले.