राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजप आमदार भातखळकर यांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईसह राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला आहे. मुंबईत काल दिवसभरात केवळ 13 लोकांना व राज्यभरात केवळ 181 लोकांनाच लस दिली आहे. केंद्राकडे बोट दाखविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळेच राज्यात लसीकरण मोहीम सपशेल अपयशी ठरली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. राज्यात 9.83 लाख लसी उपलब्ध असतानासुद्धा केवळ राजकारण करण्यासाठी लस कमी दिल्याची रड केली जात असल्याची टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

आमदार भातखळखर म्हणाले की, ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे महाराष्ट्र देशाची कोरोना कॅपिटल बनला आहे. राज्याचा मृत्यदर आज ही 2.54 टक्के इतका आहे.राज्य सरकारकडून लसीकरण मोहीम अधिक गांभीर्याने घेऊन जलद व नियोजनबद्ध राबविण्याची आवश्यकता होती. परंतु तसे न करता केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचेच काम राज्याकडून करण्यात येत आहे. मुंबईतील जेजे या एकाच रुग्णालयात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. हीच अवस्था राज्यभर आहे. तसेच राज्यसरकार व मुंबई महापालिका यांच्यात समन्वय नसल्यामुळे शनिवार व रविवार या दोन दिवशी लसीकरण बंद ठेवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी ‘इतके कमी लसीकरण होणे यात काहीही विशेष बाब नाही’ असे वक्तव्य केले आहे. राज्य सरकारने हीच गती कायम ठेवली तर राज्यातील 12 कोटी जनतेला लस मिळण्यास किती कालावधी लागेल याचा विचार राज्य सरकारने केलाय का ? असा प्रश्नदेखील भातखळकर यांनी केला आहे.