महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’,फडणवीसांचा ‘घणाघात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सरकार स्थापन केले. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकून देखील भाजपला विरोधात बसावे लागले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहेत. आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार हे एक कुटुंबाप्रमाणे असल्याचं दाखवलं जातं. पण खरं तर हे कुटुंब नाहीच आहे. एकमेकांशी सुसंवाद नसलेलं हे सरकार म्हणजे कुटुंब नसून लिव्ह इन रिलेशनशिप आहे, अशी टीका त्यांनी आज केली आहे. एका टिव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केली आहे.

मी इतिहासाचा अभ्यासक आहे. अशा प्रकारचं सरकार कधीच चालेलं नाही. या सरकारमध्ये काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेस हे सरकार चालू देणार नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात काहीही म्हणो काँग्रेसनेही असं सरकार कधीच चालू दिलेलं नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमधलं हा सरकार अंतर्विरोधानेच पडेल असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

सरकारने धाडसी निर्णय घेण्याची गरज
राज्यात कोरोनाचं संकट असल्यामुळे हातपाय गाळून बसणं परवडणारं नाही. राज्याची अर्थव्यवस्था उभी करायची असेल तर राज्य सरकारने धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे. निदान अर्थचक्र गतीमान करण्यासाठी नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालांची तरी अंमलबजावणी केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. राज्यात कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे सरकारला दोन आघाड्यांवर लढावं लागणार आहे. कोरोनाशी सामना करताना राज्य सरकारला राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावर आणावी लागणार आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी करायला हवी. त्यासाठी धाडसी निर्णय घेतले पाहिजेत. नाही तर आगामी काळात उद्योग आणि सेवा क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. हातपाय गाळून बसणं राज्याला परवडणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले.

कोरोना नियंत्रणात तर मृत्यूदर का वाढतोय ?
मुंबईत कोरोना नियंत्रणात असल्याचे सांगितले जातेय. मग मुंबईतील कोरोनाचे मृत्यू का वाढत आहेत ? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आपल्याकडे टेस्ट कमी होत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी दिसत आहे. आपल्याकडे कॅपिसिटी असतानाही पाहिजे तेवढ्या टेस्ट होत नाहीत. उलट लोकांनाच टेस्ट करण्यास सांगितले जात आहे. हे चुकीचे आहे. महाराष्ट्राने दिल्लीप्रमाणे टेस्टची संख्या वाढवली पाहिजे. टेस्टची संख्या अधिक वाढल्यास रुग्णांची संख्या वाढेल. पण कोरोना लवकरात लवकर नियंत्रणात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.