मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी गंभीर आरोप केले होते. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘सचिन सावंत यांना मी काय उत्तर देणार. त्यांना काही समजते तरी का? त्यांना उत्तर द्यायला आमचे राम कदम आहेत’, अशा शब्दांत खिल्ली उडवली.
मुंबईत फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘वाझे प्रकरणाने जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली तेवढी कोणत्याही दुसऱ्या प्रकरणाने झालेली नाही. आम्ही महाराष्ट्र पोलिस आणि मुंबईची बदनामी केली नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाला फोन टॅपिंगचा रिपोर्ट सादर केला आहे. त्यामुळे आता अनेकांचे बिंग फुटणार आहे. मी पहिली दोन पानेच दिली होती. मात्र, नवाब मलिकांनीच हा रिपोर्ट फोडला आहे. सचिन वाझे काय बोलतील म्हणून मलिक आणि त्यांचे सहकारी आता घाबरलेले आहेत’.
दरम्यान, फडणवीसांना सावंत यांच्या आरोपाबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘सचिन सावंत यांना मी काय उत्तर देणार. त्यांना काही समजते तरी का? त्यांना उत्तर द्यायला आमचे राम कदम आहेत. ते रोज काहीही बोलत असतात. असे रोज काहीही बोलणाऱ्यांना मी थोडीच उत्तर देणार’.