भीमा कोरेगाव : एकनाथ खडसेंनी ‘खोडून’ काढली शरद पवारांची ‘भूमिका’, म्हणाले…

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन – भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचारावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर आणि पुणे पोलिसांवर टीका केली होती. यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) दिला. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात असतानाच याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, शरद पवार साहेबांनी परवा मत व्यक्त केले होते की भीमा कोरेगावची दंगल ही स्थानिक पोलिसांच्या मदतीने झाली आहे. जर असं पवार साहेबांनी म्हटलं असेल तर स्थानिक पोलीस स्थानिक पोलिसांची चौकशी कसे करु शकतात ? त्यामुळे भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे देणे योग्य असल्याचे खडसेंनी सांगितले. तसेच आक्षेप जर पोलिसांवर आहे तर वरिष्ठांकडून चौकशी करण्यात यावी अशी भूमिका खडसे यांनी घेतली आहे.

दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिल्यानंतर विरोधकांनी यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. सत्य बाहेर येण्याच्या भीतीमुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला असल्याचा घणाघाती आरोप शरद पवार यांनी केला आहे. कायदा सुव्यवस्था राखणं हे राज्य सरकारचं काम आहे. या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी तारतम्य ठेवलं नाही. एल्गार परिषदेत चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली. अन्यायाबद्दल बोलणं म्हणजे नक्षलवाद होत नाही. आम्ही एसआयटीची मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने कुरघोडी करत हा तपास एनआयएकडे दिला. त्यांना सत्य बाहेर पडण्याची भिती असल्याचे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

फेसबुक पेज लाईक करा –