लखनौ : वृत्तसंस्था – लखनौमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आय. पी. सिंह यांना भाजपने पक्षातून ६ वर्षासाठी तातडीने निलंबित केले. कारण त्यांनी ट्विटरवरुन थेट भाजप नेतृत्वावरच टिका केली होती. भाजप नेतृत्वाचा उल्लेख गुजराती चोर म्हणून त्यांनी केला होता. भाजपने पंतप्रधान निवडला आहे की प्रचारमंत्री असा सवाल उपस्थित करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले होते.
आय. पी. सिंह हे गेली तीन दशके भाजपचे काम करीत होते. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशाचा पंतप्रधान टी शर्ट आणि चहाचे कप विकताना चांगले वाटते का अशी टिका केली होती. त्यानंतर त्यांना तातडीने ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले. यावर त्यांनी पुन्हा ट्विटरवरुन टिकास्त्र सोडले. ते म्हणाले, सहा वर्षासाठी माझे निलंबन करण्यात आल्याची माहिती मला माध्यमामधून मिळाली. मी माझ्या आयुष्यातील तीन दशके पक्षासाठी दिली. मात्र केवळ खरं बोललो म्हणून माझ्यावर कारवाई करण्यात आली. खरे बोलणे हा गुन्हा असेल तर पक्षातील लोकशाही संपली आहे. अशा शब्दात त्यांनी आपल्यावरील कारवाईवर भाष्य केले आहे.
पंतप्रधानांसह सर्व जण आपल्या ट्विटरवर नावापुढे चौकीदार लावत असताना सिंह यांनी मात्र आपल्या नावापुढे ऊसुलदार असा शब्द जोडला आहे. त्यावर त्यांनी म्हटले आहे की, मी क्षत्रिय समाजाचा आहे. दोन गुजराती चोर हिंदी पट्ट्यातील लोकांना गेल्या पाच वर्षांपासून मुर्ख बनवताहेत अशा शब्दात त्यांनी मोदी, शहा यांच्यावर टिका केली. आमचा उत्तर प्रदेश गुजरातपेक्षा पाच पट मोठा आहे. उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था पाच लाख कोटींची आहे. तर गुजरातची अर्थव्यवस्था १ लाख १५ हजार कोटींची आहे. या परिस्थितीत ते खाणार काय आणि काय विकास करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
https://twitter.com/ipsinghbjp/status/1110041092974612481
भाजप नेतृत्वावर टिका करीत असतानाच त्यांनी अखिलेश यादव यांची स्तुती केली आहे. आझमगढमधून अखिलेश यादव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी ट्विटरवर भाष्य करताना आझमगढमधून अखिलेश यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. यामुळे धर्म आणि जातीचे राजकारण संपेल.
https://twitter.com/ipsinghbjp/status/1110114100913364992
या अगोदर भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आपण आपल्या नावापुढे चौकीदार लावणार नाही. कारण आपण ब्राम्हण असल्याचे सांगितले होते.