भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळले म्हणून ‘ते’ इथपर्यंत पोहचले : किरीट सोमय्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवत सरकार स्थापन केले. त्यानंतर भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले जात आहे. नवी मुंबईमध्ये भाजपच्या प्रदेश राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये देखील भाजप नेत्यांनी शिवसेनेला टार्गेट करत टीका केली आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात 2014 पासून महाविकास आघाडीची चर्चा सुरु होती असे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तर लोकसभा निवडणुकीच्यावेळी शरद पवारांसोबत संपर्कात होतो हे संजय राऊत यांनी कबूल केले आहे. त्यामुळे विश्वासघात कुणी केला असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला. तर भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून ते इथपर्यंत पोहचले असल्याचा टोला त्यांनी लगावला.

सरकार पाडण्यासाठी कोणतही ऑपरेशन राबवण्याची गरज नाही
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना म्हटले, उद्धव ठाकरेंना रात्र-दिवस कमळचं दिसत आहे. तर आम्हाला तुमचं सरकार पाडण्यासाठी कोणत्याच ऑपरेशन राबवण्याची गरज नाही. कारण तुमचा एक पाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ओढत आहेत. आणि दुसरा पाय काँग्रेसचे राहूल गांधी ओढत आहेत. जे सरकार स्वत:च पडणार, त्याच पाप आम्ही का घ्यावं ? अशी जहरी टीका सोमय्या यांनी भाजपच्या प्रदेश राज्य परिषदेत बोलताना केली.

शिवसेनेला हे पटणारे आहे का ?
किरीट सोमय्या यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणतात की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला राम मंदिरात जाणार आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांच्यासोबत सत्तेत असलेले त्यांचे जोडीदार समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचे चिरंजीव म्हणतात, उद्धव ठाकरे राम मंदिरात जाणार असतील तर आम्ही बाबरी मस्जिद बनवू. त्यामुळे हे शिवसेनेला पटणारे आहे का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.