लालकृष्ण अडवाणींचा भाजपला घरचा आहेर

राजकीय मतभेद असणाऱ्यांना भाजप 'देशद्रोही' मानत नाही !

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – सत्ताधारी भाजपचे भीष्म पितामह आणि माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट दिले नाही. त्यांच्या वयाचे कारण समोर करुन त्यांचे तिकीट कापण्यात आले. तिकीट कापल्यानंतर अडवाणी यांनी पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगवरुन पक्षाच्या सध्याच्या कार्यशैलीवर टीका केली आहे. भाजपने राजकीय विरोधकांना कधीच दुश्मन मानले नाही. जे आमच्याशी सहमत नाहीत त्यांना देशद्रोही कधीच म्हणालो नाही, असे नमूद करुन त्यांनी भाजपच्या तथाकथित देशभक्तांच्या कानपिचक्या घेतल्या आहेत.

भाजपने अडवाणी यांना तिकीट न देता त्यांचा राजकीय प्रवासातून पत्ता कट केला आहे. तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी आपल्या वेदना ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. भाजप ६ एप्रिलला स्थापना दिवस साजरा करेल. हा क्षण भाजपमध्ये सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. आम्ही थोडे मागे पाहिले पाहिजे, पुढे पाहताना आजूबाजूलाही पाहिले पाहिजे. भाजपच्या संस्थापक असणाऱ्यांपैकी एक मी पण होतो. या भूमिकेतून देशातील जनतेशी अनुभव कथन करण कर्तव्य समजले. पक्षासह या सर्वांनी मला स्नेह आणि सन्मान दिला असल्याचे त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

अडवाणी यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील नागारिकांचेही आभार मानले आहेत. मातृभूमीची सेवा करणे हे माझे मिशन होते. मी १४ वर्षाचा होतो त्यावेळी मी आरएसएसमध्ये दाखल झालो होतो. सत्तर वर्ष मी पक्षाशी अविभाज्यपणे जोडला गेलो आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी अशा दिग्गज नेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली.