संजय राऊत विदूषक, कोणत्या धुंदीत आहात ?, नारायणराणेंचा ‘घणाघात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (shivsena) 25 वर्षे सत्तेत राहील या शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केलेल्या दाव्याचा भाजप (bjp) नेते आणि खासदार नारायण राणे (narayan rane) यांनी चांगलाच समाचार घेतला. शिवसेना 25 वर्षे सत्तेत राहणार ? कोणत्या धुंदीत आहात ? असा सवाल करतानाच संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत, अशी जहरी टीका नारायण राणे यांनी केली. मुंबई भाजपच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी राणे यांनी पत्रकार परिषद घेतली.

काल झालेल्या दरसा मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना सत्तेतील पाच वर्षे पूर्ण करणार असं सांगितलं. त्यानंतर 25 वर्षे शिवसेना सत्तेत राहील असंही त्यांनी सांगितले. दुसरीकडे आमचं सरकार पाडा असं आव्हानही दिलं. दिल्लीतून 200 कोटी आणा असंही राऊत म्हणाले. जणू काही दिल्लीतील नेते राऊत यांना विचारूनच निर्णय घेतात, अशा अविर्भावात ते बोलत होते, असा चिमटा राणे यांनी काढला. काय माणूस आहे हा ? काय बोलतो ? आधी म्हणतो 25 वर्षे राज्य करू, नंतर म्हणतो 5 वर्षे सरकार टीकेल. कोणत्या धुंदीत आहात ? कोणत्या स्वप्नात आहात ? की रिया चतुर्वेदींनी काय पाठवलं ? असे सवाल करतानाच संजय राऊत हे विदूषक आहेत. चेष्टेचा विषय झाले आहेत, अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी उगाच वाघ असल्याचा आव आणू नये. खालच्या स्तरावरची भाषा वापरु नये. केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असल्याने मी शांत आहे. असेही नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या जीवावर एकही काम आजपर्यंत पूर्ण केलेलं नाही. आम्ही वाघ आहोत म्हणे, कोणी सांगितलं वाघ आहे. पिंजऱ्यातला वाघ आहे की बाहेरचा ते पण स्पष्ट करा. शिवसेनेला सत्तेत आणून बसवलं कारण आम्ही वाघ होतो. बेडूक म्हणून नाही. उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस. आमच्यावर बोललात तर याद राखा 40 वर्षात जे काही पाहिलं ते सर्व बाहेर काढेन असा इशारा देत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हल्लाबोल केला.