‘ह्यांना एवढी हाय क्वालिटी नशा मिळते तरी कुठून ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात आज जर युपीएचं सरकार असतं तर आम्ही चीनला बाहेर फेकून दिलं असतं. त्यासाठी आम्हाला 15 मिनिटांचाही वेळ लागला नसता असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधींच्या या विधानावरून भाजपच्या एका नेत्यानं वादग्रस्त विधान केलं आहे. राहुल गांधींना इतकी हाय क्वालिटी नशा मिळते तरी कुठून असं वक्तव्य भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

नरोत्तम मिश्रा म्हणाले, “10 दिवसात कर्जमाफी, चीनला 15 मिनिटांत बाहेर करणं, ज्यांनी राहुल गांधींना हे शिकवलं आहे त्यांना मी सेल्युट करतो. राहुल गांधी यांना इतकी हाय क्वालिटी नशा मिळते तरी कुठून ?” असं म्हणत मिश्रांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे.

आम्ही सत्तेत असतो तर चीनला 15 मिनिटात बाहेर फेकून दिलं असतं.

राहुल गांधी यांनी नव्यानं बनवलेल्या कृषी कायद्याविरोधात आपली भूमिका मांडली होती. हाथरस बलात्कार प्रकरण, कृषी कायदे, लॉकडाऊनमधील समस्या, कोरोनातील अपयश, सीमारेषेवरील भारत-चीन वाद अशा अनेक विषयांवरून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. राहुल गांधी म्हणाले, “चीननं भारताच्या हद्दीत प्रवेश केला तरी मोदी सरकार गप्प आहे. देशात आजमितीला युपीएचं सरकार असतं तर आम्ही चीनला बाहेर फेकून दिलं असतं. त्यासाठी आम्हाला 15 मिनिटांचाही वेळ लागला नसता.”