शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणून उडवली होती खिल्ली, आता रावसाहेब दानवे पुन्हा म्हणाले – ‘2 महिन्यात भाजपचे सरकार सत्तेवर येईल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात संबोधित करताना भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यात येणाऱ्या दोन महिन्यांत भाजपचे सरकार सत्तेवर येईल, असा दावा केला होता. त्यावर “ज्योतिष शास्त्रातील जाणकार म्हणून त्यांचा परिचय करून दिलाय, मात्र जनता सोबत असल्यावर कुरधुड्या ज्योतिषाचे काय चालत नाही,” असे म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खिल्ली उडवली होती. त्यावर आता दानवे यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबईत वार्ताहरांना बोलताना दानवे म्हणाले, “माझ्यावर टीका करण्याचा शरद पवार यांना अधिकार असून, ते या महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर मी टीका करणार नाही. परंतु, मला एक गोष्ट कळते, की राज्यातील जनता सरकारच्या कारभारावर नाराज आहे. हा माझ्या भविष्याचा प्रश्न नाही.” त्याचसोबत सरकार कधी येणार असे विचारल्यावर दानवे यांनी सांगितलं, “दोन महिन्यांत सरकार येईल. मात्र, सरकार कसे येणार? याबाबतीतील नियोजन तुम्हाला कसे सांगू,” असेही ते म्हणाले.

दोन महिन्यांत सरकार

महाविकास आघाडीत वेगळ्या विचारांचे पक्ष सहभागी असल्याने त्यांच्यात तीव्र मतभेद आहेत. कोणाचा कोणाला पायपुस नाही. त्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये राज्यात भाजपचे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते.

शरद पवारांनी रावसाहेब दानवे यांना ‘ज्योतिषी’ असे म्हणत उडवली खिल्ली

गेली अनेक वर्षे रावसाहेब दानवे विधिमंडळात काम करत असून, त्यांचा हा गुण मला माहिती नव्हता. खेड्यापाड्यात शेतकऱ्यांत काम करणारा सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहात होतो. मात्र, उद्याचे चित्र सांगण्याचा अभ्यास आणि तयारी मला माहिती नव्हती. त्यांनी सांगितले आहे, तर तसे होईल. ज्योतिष शास्त्रातील जाणकार म्हणून त्यांचा परिचय करून दिलाय, पण सामान्य जनता असल्यावर कुरधुड्या ज्योतिषाचे काही चालत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं.