‘अब की बार बाप-बेटे की सरकार’, भाजपाचा शिवसेनेवर ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करत भाजपने आज राज्यभर आंदोलन केले आहे. भाजपने मुंबईतील आझाद मैदानात सभा घेतली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर हल्लाबोल करत ‘अब की बार बाप-बेटी की सरकार’ अशी जोरदार टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारने केलेली शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिला अत्याचाराच्या घटनांवरून सरकारला धारेवर धरले आहे. त्यातच आज भाजपने संपूर्ण राज्यात आंदोलने केली. मुंबईतील आझाद मैदानावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी अब की बार बाप-बेटी की सरकार अशी टीका केली. तसेच महिलांवर अत्याचार करणारे नराधम मोकाट कसे ? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.
सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका करताना हे सरकार स्थगिती सरकार असल्याची टीका केली.

मागील सरकारच्या काळातील योजनांची चौकशी करण्याच्या मुद्यावरून त्यांनी सरकारला आव्हान दिले. कितीही चौकशी केली तरी, काही सापडणार नाही. मागील सरकारमध्ये शिवसेनाही सत्तेत होती, हेच ते विसरले आहेत, असा टोला देखील सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.