…तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भीमा कोरेगाव प्रकरणामुळे महाविकासआघाडीतील दोन पक्ष आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी आरोप केला आहे की भीमा कोरेगाव प्रकरण तत्कालीन सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र आहे. या प्रकरणाची एटीएसद्वारे चौकशी करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. तर राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी भूमिका मांडली की प्रकरणातील पुरावे पोलिसांनी खातरजमा करुन दाखल केलेले असून न्यायालयाने देखील ते मान्य केले आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये भीमा कोरेगाव प्रकरणी एकवाक्यता नसल्याचे समोर येत आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणी परस्परविरोधी भूमिका मांडणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला. शरद पवारांना राज्यातल्या पोलिसांवर संशय आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तत्कालीन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या कामावर त्यांना शंका आहे का? केसरकर शिवसेनेचे नेते आहेत, मग या प्रकरणात शिवसेना दोषी आहे का? असे सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. यामध्ये शिवसेना दोषी असल्यास या प्रकरणाची चौकशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कशी करणार त्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल असेही मुनगंटीवर म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार पत्रात –
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, त्यात ते म्हणतात की 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव-भीमा येथे 200 वा विजय दिवस साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं दलित बांधव एकत्रित जमले होते. काही समाजविघातक घटकांकडून मेळावा उधळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचं पर्यवसान दंगलीत झालं. मात्र पोलिसांनी दंगलीस आदल्या दिवशी पुण्याच्या शनिवारवाडा परिसरात झालेल्या एल्गार परिषदेतील चिथावणीखोर वक्तव्य कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढला. तसेच दंगल घडवण्यात माओवादी संघटनेचा हात असल्याच्या संशयावरुन अटकसत्र सुरु केले. माओवाद्यांशी संबंध असल्याचं दाखवून, व्यवस्थेविरूद्ध संघर्ष करणाऱ्या बुद्धिजीवी, प्रतिष्ठित व निरपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले.

काय म्हणाले माजी गृहराज्यमंत्री –
केसरकर भीमा कोरेगाव प्रकरणावर बोलताना म्हणाले की, या प्रकरणी पोलिसांनी तपास करुन न्यायालयासमोर पुरावे ठेवले, त्या पुराव्यांची खातरजमा करण्यात आली आहे. न्यायालयाने ते पुरावे मान्य केले आहेत. या प्रकरणी स्थापन समितीपुढे हे पुरावे ठेवण्यात आले होते. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. या प्रकरणी समितीचा अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल की काय खरे अन् काय खोटे.

फेसबुक पेज लाईक करा –