आधी पवारांना विचारा राहुल गांधीच पंतप्रधान हवेत का ? ; तावडेंचा ठाकरेंवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गुढी पाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये भाषण करत मोदींवर जोरदार निशाणा साधला. त्यावर भाजपकडून राज ठाकरेंवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. राहुल गांधी पंतप्रधान हवे का, ते शरद पवारांना विचारा, अन्यथा पुढच्या स्क्रीप्ट मिळणार नाहीत, असा पलटवार भाजपचे नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंवर केला आहे.

देश खड्ड्यात घालायला राहुल गांधींना पंतप्रधान करा, म्हणायला तो काय मनसे पक्ष आहे का ? आणि राहुल गांधी पंतप्रधान हवे का ते शरद पवारांना विचारा, अन्यथा पुढच्या स्क्रीप्ट मिळणार नाहीत.” अशी टीका विनोद तावडे यांनी राज ठाकरेंवर केली. पंतप्रधानपद हा काही खेळ नाही, हा भारत देशाचा प्रश्न आहे, असा टोमणाही तावडेंनी यावेळी लगावला.

तावडेंनी फक्त राज ठाकरेंवर निशाणा साधला नाही तर मनसे सैनिकांनाही डिवचण्याचा प्रयत्न केला. संजय निरुपम राज ठाकरे यांना लुक्का म्हणाले होते. आता राज ठाकरे मनसैनिकांना सांगणार, निरुपम यांना मतदान करा. हा मनसैनिकांवर अन्याय आहे, असं विनोद तावडेंनी यावेळी म्हटलं.

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सभेत राज ठाकरे यांनी विविध उदाहरणं देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सराकरची पोलखोल केली. त्यावरही विनोद तावडे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. एवढा अभ्यास पक्षासाठी केला असता, तर फायदा झाला असता. आधी कष्ट घेतले असते तर दुसऱ्याला मदत करायची वेळ आली नसती, असा टोमणाही त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, ज्या व्यक्तीवर विश्वास राहिला नाही, त्याला पुन्हा निवडून देण्याची गरज नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होते. तसंच भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहनही त्यांनी केले. माझ्या प्रचाराचा फायदा आघाडीला होईल, तर तो होऊ द्या, कुणी माझा वापर करुन घेईल एवढा मी वेडा नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.