भाजप नेत्यांची काँग्रेस-राष्ट्रवादीत घरवापसी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यात झालेल्या निवडणुकांचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसला दमदार यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रातही खान्देशातील भाजपचे मोठे नेते  काँग्रेस-राष्ट्रवादीत घरवापसी करण्याची चिन्हं आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभेच्या निकालानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. याचाच परिणाम म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले काही नेते घरवापसी करण्याची शक्यता आहे.

यापूर्वी  भाजप सत्तेत आल्यानंतर अनेक जणांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष सोडल्याच्या घटना आहेत. आता पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांत  काँग्रेसला यश मिळाले आहे. त्यावरून महाराष्ट्रातही  राजकीय वातावरण ढवळून निघाले असून काही जण पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत.

खासदारांचे पक्ष बदलण्याचे संकेत

भाजपमध्ये गेलेल्या आणि भाजपमध्ये असलेल्या नेत्यांची पक्ष बदलण्याची चाचपणी गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. भाजपविरोधातील जनमत, पक्षात होणारी घुसमट अशा अनेक कारणांमुळे काही नेते आणि खासदार पक्ष बदलण्याचे संकेत आहेत. भाजपचा खान्देशातील मोठा नेता पक्षाला रामराम करण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, शिवसेनेचा मराठवाड्यातील मोठा नेताही लोकसभा निवडणुकीत वेगळा विचार करण्याची शक्यता आहे. भाजप नेत्याला उत्तर देण्यासाठी पक्ष बदलून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस या नेत्यांनी केलेल्या चाचपणीनंतर हे तर्क लढवले जात आहेत.

मध्य प्रदेशात भाजपने काँग्रेसला कडवी झुंज दिली, मात्र काँग्रेसला ११४ जागा मिळाल्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. छत्तीसगडमध्ये भाजपचा सुपडासाफ झाला, तर राजस्थानातही भाजपचं सरकार खालसा झालं.