#Loksabha : महाराष्ट्रातील भाजपच्या ५ विद्यमान खासदारांचा पत्ता कट ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. दिल्लीत आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून त्यानंतर भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते. इशान्य मुंबई मतदारसंघाचे खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध होत असल्याने त्यांचा पत्ता कट होण्याची शक्याता आहे.

भाजप-शिवसेनेने गेल्याच महिन्यात युती करण्याचा निर्णय घेतला. मागील चार वर्षांपासून शिवसेना-भाजपामध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये भाजप, शिवसेनेचे नेते समोरासमोर उभे ठाकले होते. यातील जालन्याचा तिढा गेल्या आठवड्यात सुटला. राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात समेट घडवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना यश आले. मात्र, ईशान्य मुंबई मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे. या मतदारसंघाचे खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याशिवाय मुलुंडचे आमदार सरदार तारासिंह यांचाही सोमय्यांना विरोध आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत पर्याय शोधण्याचे आदेश दिल्लीहून राज्य भाजपाला देण्यात आले आहेत.

काँग्रेसने राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादीने आघाडी घेत दोन याद्या जाहीर केल्या आहेत. यानंतर आता सत्ताधारी भाजपकडून आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजप राज्यातील ४८ पैकी २५ जागा लढवणार आहे. सध्या भाजपचे राज्यात २२ खासदार आहेत. यापैकी पाच खासदारांचे तिकीट कापले जाऊ शकते. पाच वर्षांमधील कामगिरी, जनसंपर्क यांच्या आधारे भाजप नेतृत्त्वाकडून तिकीट वाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होईल. यामध्ये प्रत्येक मतदारसंघाचा विचार केला जाईल.