मेगा भरतीनं भाजपाचं सरकार घालवलं : एकनाथ खडसे

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मेगाभरती ही मेगाचूक ठरली अशी कबुली दिल्यानंतर आता भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी पक्षावरच निशाणा साधला. मेगाभरतीमुळेच माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना फटका तर बसलाच शिवाय भाजपने सरकार घालवले अशा शब्दात एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली.

एकनाथ खडसेंनी शनिवारी जळगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. खडसे म्हणाले की भाजपने लोकसभा निवडणूकीच्या काळात मेगा भरती सुरु केली, मेगाभरतीला जोर आला. भाजपने मेगा भरतीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आपल्याकडे ओढले. परंतु, ही मेगाभरती करताना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांवर आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांच्या विरोधात सतत दंड थोपटले अशाच नेत्यांना स्थान देण्यात आले.

याठिकाणी भाजपच्या राज्य नेतृत्वाने आपल्याच पक्षातील ज्येष्ठांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. मेगाभरतीमुळे भाजपला विधानसभा निवडणूकीत 220 पेक्षा जास्त जागा सहज मिळतील असे पक्षश्रेष्ठींना वाटले होते. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना निर्णय प्रक्रियेत डावलले काय आणि त्यांनी तिकीट नाकारले काय काही फरक पडत नाही अशी भूमिका पक्ष श्रेष्ठींची घेतली. त्यानंतर मेगाभरतीत आयात केलेल्या नेत्यांना तिकिटाची खैरात वाटली. परंतु झाले उलटेच, ज्यांना भाजपने तिकीटं वाटली त्यांनाच जनतेने साफ नाकारले असेही खडसे म्हणाले.

पुढे बोलताना खडसे म्हणाले की मेगा भरतीचा फटका फक्त पक्षालाच नाही तर माझ्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांना देखील बसला. आताच्या महाविकासआघाडी सरकारमध्ये भाजपने केलेल्या मेगा भरतीचे मूळ आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच आता खरं बोलण्याची हिंमत दाखविल्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो, त्यामुळे आता पक्षनिती बदलेल आणि सुधारणा करेल अशी अपेक्षा आहे.

संजय राऊतांवर टीका –
एकनाथ खडसेंनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. यावेळी संजय राऊतांवर टीका करताना खडसे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडून पुरावे मागणे चुकीचेच नाही, तर हा शुद्ध मुर्खपणा आहे. राऊतांनी असे वक्तव्य करायला नको होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/