अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘तुमचे पर्यावरण प्रेम हे पुर्णतः बोगस अन् बेगडी, आदित्य ठाकरेंचाही ढोंगी चेहराही झाला उघड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पर्यावरण प्रेम दाखवत मुंबईकरांच्या हक्काच्या मेट्रोचे कारशेड आरे मधून इतरत्र हलविणाऱ्या ठाकरे सरकारने आता आरे मध्येच SRA जाहिर करून आरेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे कारस्थान चालविले आहे. हे अत्यंत संतापजनक असून मंत्री आदित्य ठाकरे व ठाकरे सरकारचे पर्यावरण प्रेम हे पूर्णतः बोगस व बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी टीका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. याविरोधात भाजपा जन आंदोलन उभारेल अन् गरज पडल्यास उच्च न्यायालयात सुद्धा जाणार असल्याचा इशारा भातखळकरांनी दिला आहे.

उच्च न्यायालयाने आरमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास बंदी घातली आहे. तरीही ठाकरे सरकारने आरेमधील तब्बल 32310 वर्ग फूटाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहिर केला. हा परिसर संवेदनशील क्षेत्र असतानाही हा प्रकल्प केला जात आहे. आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही उघड झाला आहे. मुंबईकरांचे भले करणारी मेट्रो कारशेड नको, मात्र बिल्डरांचे उखळ पांढरे करून टक्केवारची सोय करणारी SRA योजना हवी, असा आरोप भातखळकरांनी केला आहे. मेट्रो कारशेड प्रकल्प खोटे कारण देत आरे येथून हलवून नुकसान केले. पण आता स्वतः सह बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यासाठीच सरकारचे हे उद्योग सुरू असल्याचे भातखळकरांनी म्हटले आहे.