भाजप आमदाराचा अजित पवारांवर आरोप, म्हणाले – ‘भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवला’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीला पुण्यातील मांजरी खुर्द येथील २८ एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. यावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी म्हटले की, हा प्रकल्प विदर्भात होणार होता, मात्र अजित पवारांनी तो पुण्याला पळवला आहे असा खळबळजनक आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी केला आहे. यावेळी आमदार खोपडे हे नागपूरमध्ये माध्यमाशी बोलत होते.

भारत बायोटेक कंपनीला कोव्हॅक्सिन लस निर्मितीसाठी पुण्यात सरकारने २८ एकर जागा कंपनीला हस्तांतरित केली आहे. तसेच आवश्यक यंत्रसामग्रीसह अन्य सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यावरून आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, नवे प्रकल्प आणण्याची हिंमत नसलेल्या विदर्भातील नेत्यांनी किमान आलेले प्रकल्प थांबवण्याची देखील हिंमत दाखवली नाही. विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प आणण्यासाठी अधिकारी धडपड करतात. परंतु, त्यांना राजकीय स्थान मिळत नाही. त्यामुळे ते पळविले जातात. ही विदर्भासाठी दुर्दैवी बाब असून, पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह काँग्रेसचे नेते गप्प का बसले?; असा थेट प्रश्न आमदार खोपडे यांनी केलाय.

पुढे आमदार खोपडे म्हणाले, नागपूरमध्ये मिहान परिसरात सिरम आणि भारत बायोटेकला निमंत्रित करण्यात आले होते. भारत बायोटेकची कंपनी स्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. तसेच सादरीकरण करण्याचे निर्देशही दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मिहान प्रोजेक्टबाबत माहिती होती. असे असताना देखील विदर्भावर अन्याय करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबद्दल त्यांनी शब्दही काढला नाही असे खोपडे यांनी म्हटले आहे.