भाजप आमदाराचा शिवसेनेला सवाल, म्हणाले – ‘तेव्हा मोर्चा का काढला नाही ?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांवर ईडी कारवाई करत आहे. दरम्यान, प्रताप सरनाईकांपाठोपाठ संजय राऊत यांना ईडीची नोटीस आली आहे. प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयानं (ED) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला नोटीस पाठवल्यामुळं शिवसेना आक्रमक झाली आहे. ईडीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी शिवसैनिकांनी केली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी सडकून टीका केली आहे.

‘शिवसेना मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी निघाला नाही. हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही. हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची आणखी मदत मिळावी म्हणून निघाला नाही. पण आता घरातली उणीदुणी बाहेर निघताहेत म्हणून मोर्चा काढला जात आहे. हाच का महाराष्ट्र धर्म आहे,’ असा सवाल नीतेश राणे यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस पाठवली आहे. तेव्हा राऊत यांनी ईडी आणि त्यानिमित्ताने केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार आरोप केले आहेत. ५५ लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे. वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. याआधी प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनाही ईडीने नोटीस पाठवली होती. आमदार प्रताप सरनाईक यांना काही दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. टॉप्स सेक्युरिटीशी संबंधित हे प्रकरण होते ईडीच्या नोटिसा म्हणजे सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारचे षडयंत्र असल्याचा शिवसेनेने आरोप केला होता.

येत्या ५ जानेवारीला वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहे. त्यावेळी अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत हजर राहणार आहेत. शिवसेनेकडून एकप्रकारचे शक्तिप्रदर्शनच केले जाणार असल्याचं समजतं.