पालघर साधू हत्याकांड आम्ही विसरलो नाही; भाजपचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर साधू हत्याकांड आम्ही विसरलेलो नाही, असा इशारा देत या हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे देण्याची सुबुद्धी राज्यातील ठाकरे सरकारला (Maha Vikas Aghadi Government) यावी, असे साकडे आम्ही सिद्धिविनायकाला घालणार आहोत,’ अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे आमदार राम कदम (bjp Mla Ram Kadam) यांनी आज दिली.

महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या परवानगीनंतर आजपासून राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली. त्यानिमित्त भारतीय जनता पक्षाने जल्लोष केला. भाजपच्या अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांसह आपापल्या शहरातील मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले. या वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्रही सोडले आहे.

भाजपचे आमदार राम कदम हे सपत्नीक वाजत-गाजत, गुलाल उधळत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ (Strongly Criticizes Maha Vikas Aghadi Government) डागली. ज्या दिवशी बिअर बार, दारूचे ठेके उघडले, तेव्हाच मंदिरांसाठी नियम तयार करता आले असते. पण हे सरकार बदल्यांमध्ये गुंतलेले आहे. या अहंकारी सरकारला मुद्दामच ते करायचे नव्हते. जनता रस्त्यावर उतरली. साधूसंत संतप्त झाले. त्यामुळे घाबरून सरकारला मंदिरे उघडावी लागली आहेत. हा विजय साधूसंतांचा आहे. 11 कोटी जनतेचा आहे. मंदिरातल्या पुजाऱ्यांचा व मंदिराबाहेर हारफूल विकणाऱ्यांचा असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील तीन पक्षांच्या सरकारच्या मुस्काटात आज सणसणीत बसली आहे. महाराष्ट्राच्या सरकारची ही प्रचंड मोठी हार आहे. परमेश्वराच्या दरबारात चित्रगुप्त नावाची व्यवस्था असते, जी पाप-पुण्याचा हिशेब लिहिते. त्या चित्रगुप्ताच्या दरबारात या सरकारला मोठे शाप मिळणार आहेत. सिद्धिविनायक, साईबाबा, महालक्ष्मी, तुळजाभवानीच्या भक्तांनी या तीन पक्षांना कधीच माफ करू नये, असे आवाहन कदम यांनी यावेळी केले आहे.