उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा राजकीय स्टंट, भाजपचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या खासदारांसोबत पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा दौरा केवळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप केला आहे. हा आरोप उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केला आहे.

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यावर अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगत ते पुढील दिशा ठरवतील असे म्हटले आहे. यावर भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचा अयोध्या दौरा हा केवळ राजकीय स्टंट असल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री शर्मा यांनी म्हटले आहे. तर भाजप नेत्या मिनाक्षी लेखी यांनी उपहासात्मक टीका करताना शिवसेना काँग्रेससोबत अयोध्येला जाणार का ? असा सवाल केला आहे.

तसेच ज्या काँग्रेसने रामाच्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले त्या काँग्रेसला तुम्ही अयोध्येत घेऊन जाणार आहात का ? असा सवाल लेखी यांनी केला आहे. तर शायना एनसी यांनी राज्यातील आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेची विचारधारा नेमकी कोणती असा सवाल करत ही महाविनाश आघाडी असल्याचे शायना एनसी यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –