ममतांनी शपथविधीला येऊच नये, ‘या’ नेत्याने केले विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला देशातील तसेच विदेशातीलही अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देखील या शपविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळाले होते. परंतु त्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर गुरूवारी भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ममतांनी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहूच नये, असे तिवारी यांनी म्हंटले आहे.

ममता बॅनर्जी यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहूच नये. त्यांनी लोकशाहीत हिंसाचार केला आहे. अशा प्रकारच्या सोहळ्यांमध्ये सहभागी होऊन इतरांच्या डोळ्यात डोळे घालून त्या बघूच शकत नाहीत, असे मनोज तिवारी यांनी म्हंटले आहे. याअगोदर ममता बॅनर्जी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार होत्या. परंतु अखेरच्या क्षणी माघार घेत त्यांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला होता.

ममता बॅनर्जी यांनी म्हंटले होते की, तुमचे आमंत्रण स्वीकारले होते आणि तुमच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पण गेल्या काही दिवसांमधील रिपोर्ट्स पाहिले असता त्यामध्ये भाजपाने ५४ कार्यर्त्यांच्या परिवाराला बोलवलं आहे. ज्यांची हत्या राजनैतिक हत्या झाल्याचे सांगितले जाते. पण बंगालमध्ये अशी कोणतीही राजकीय हत्या झालेली नाही. बंगालमध्ये झालेल्या हत्या वैयक्तिक भांडणामुळे झाल्या आहेत. त्याचा राजकाराणाशी काही संबंध नाही. त्याला राजकीय रंग दिला जातोय. त्यामुळे सॉरी नरेंद्र मोदीजी आपल्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार दिला होता.