महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर अमित शहांचं मोठं ‘विधान’, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूकीनंतर पहिल्यांदाच माध्यमासमोर आलेल्या भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. यावेळी अमित शाह यांनी राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीचे समर्थन केले.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की राष्ट्रपती राजवटीचा बाउ करण्याची गरज नाही. राज्यपालांनी 18 दिवसांचा सत्तास्थापनेसाठी कालावधी दिला होता, आता सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी 6 महिन्याचा कालावधी दिला आहे. आता सर्वांकडे वेळच वेळ आहे.

अमित शाह राज्यातील युतीवर बोलताना म्हणाले की पुढील मुख्यमंत्री फडणवीसच होणार असे अनेकदा सांगण्यात आले होते. हे मी स्वत:, पंतप्रधान मोदींनी देखील सांगितले होते. परंतू अमित शाह यांनी अडीच वर्षाचा मुख्यमंत्री या शिवसेनेच्या दाव्यावर बोलणे टाळले. अमित शाह म्हणाले की खोलीबंद झालेली चर्चा सार्वजनिक करणं योग्य नाही. तसे संस्कार आमच्या पक्षावर नाहीत.

राज्यात फेरनिवडणूका व्हाव्यात असे वाटते का असे विचारले असता शाह म्हणाले की मला वाटत नाही मध्यावधी निवडणूका व्हाव्यात. परंतू हे बोलताना अमित शाह यांनी राष्ट्रपती राजवटीचे समर्थन केले. अमित शाह म्हणाले की आज कोणाकडे बहुमत असेल तर त्यांनी दावा करावा. तुमच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करण्याचा अधिकार आहे परंतू संख्याबळ नाही. राज्यपालांनी कमी कालावधी दिला हे सांगून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात जाणाऱ्या कपिल सिब्बल यांच्यावर देखील शाहांनी टीका केली.

Visit : Policenama.com