एक हसतमुख आणि दुसरे देशमुख, या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली : नितीन गडकरी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज सोलापुरात सभा आयोजित करण्यात आली होती. सोलापूरचे भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी ही सभा आयॊजीत करण्यात आली होती. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. केवळ काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेच नाही तर नाव न घेता दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर देखील त्यांनी टीका केली. ‘एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली.’ असे नितीन गडकरी म्हणाले.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले , ” म्हातार वयात लोकसभा निवडणुकीसाठी सुशीलकुमार शिंदे कशाला उभे राहिले माहिती नाही. असे म्हणत नितीन गडकरी यांनी शिंदेंवर तोफ डागली. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मुसलमान, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूरांची गरिबी हटली का? काँग्रेस पक्षाने गरिबी हटवली, ती फक्त कार्यकर्ते, नेते, चेले चपाट्यांची गरिबी हटवली.’ असंही नितीन गडकरी म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी वर टीका करताना नितीन गडकरी म्हणाले, ” काँग्रेस राष्ट्रवादीची सध्याची अवस्था दिल के टुकडे हुए हजार एक यहा गिरा, एक वहा गिरा.’ अशी झाली आहे. ७० वर्षाचा इतिहास हा बेईमानी आणि गद्दारीचा इतिहास आहे.” अशी टीकाही नितीन गडकरी यांनी केली आहे.

दरम्यान सोलपूर लोकसभा मतदार संघात यंदाची लोकसभा मोठी उत्कंठा वाढवणारी आहे. कारण एकीकडे काँग्रेसकडून जेष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर वंचित बहुजन आघाडी कडून प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या तिघांच्यात चुरस रंगणार असे दिसते आहे.