राजकीय सन्मान नाही मिळाला तरी भाजपसोबतच : ‘या’ नेत्याने केले वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना-भाजपा युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी जागावाटप करून आपले उमेदवार जाहीर केले. त्यात पहिल्या टप्प्यातील मतदानही पार पडले. दोन्ही पक्षांनी जागावाटप केले मात्र यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआयला (ए) एकही जागा देण्यात आली नाही. यानंतर आठवले यांनी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली. तसेच भाजपसोबत राजकीय सन्मान मिळाला नाही म्हणून त्यांनी खंतही व्यक्त केली होती. परंतु असे असले तरी आपण भाजपसोबतच राहु असे आठवले यांनी म्हटले आहे. त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले.

रामदास आठवले हे ईशान्य मुंबई या मतदारसंघासाठी आग्रही होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा पर्य़ाय दिला. हा पर्याय आठवलेंना मान्य नसल्याने तो नाकारला. तसेच कमळ सोडून इतर कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढवली असती ती जिंकून येणार नाही याची खात्री मुख्यमंत्र्यांना होती असेही आठवले म्हणाले. यावर आपण नाराज आहोत आणि भाजपने आपला राजकीय सन्मान केला नाही अशी खंत आठवले यांनी व्यक्त केली. याशिवाय कुठलाच पर्याय आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी आपण भाजपसोबत राहू असे आठवले यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीमुळे शिवसेना भाजप युतीलाच फायदा होईल असेही आठवले म्हणाले. प्रकाश आंबेडकरांच्या सभेला गर्दी होत आहे. २००९ साली आपण रिडालोसची स्थापना केली होती, तेव्हा आमच्या सभांनाही गर्दी होत होती. परंतु आमचा एकही उमेदवार तेव्हा निवडून आला नव्हता असे आठवले म्हणाले.