‘सरकार महत्त्वाचं की अस्मिता ? शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाकाळात लोकांचे प्रश्न महत्त्वाचे असल्याने भाजप रस्त्यावर उतरून मदत कार्यात सक्रीय आहे. भाजप नामांतराच्या मागे लागलेला नाही. शहरांचे नामांतर करुन काही फायदा होत नाही, अशी भूमिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar)  यांनी रविवारी (दि.3) पत्रकार परिषदेत मांडली. संभाजीनगर नामकरण मुद्यावरुन शिवसेनेची भूमिका धरसोड वृत्तीची असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी सरकार हवे की अस्मता हे स्पष्ट करावे, अशी मागणी करुन दरेकर यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

पुण्यात कार्यक्रमासाठी आलेल्या दरेकरांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक दिपक पोटे, राजेश येनपुरे, संदीप खर्डेकर उपस्थित होते. औरंगाबादचे नामंतर, ईडी प्रकरण, मराठा आरक्षणासह अनेक मुद्यांवरुन प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

दरेकर म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामकरणाला विरोध केला. तर संजय निरुपम सांगतात सरकार आमच्यामुळेच आहे. तसेच अशोक चव्हाण म्हणतात, हा विषय आमच्या अजेंड्यावर नव्हता. मग यावर शिवसेना आपली भूमिका स्पष्ट का करत नाही. संजय राऊत म्हणतात एकत्र बसून विषय मिटेल. आधी सरकार महत्त्वाचे कि अस्मता यावर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे दरेकर म्हणाले.

ईडी विरोधात रस्त्यावर उतरणाच्या शिवसेनेच्या विषयावर भाष्य करताना दरेकर म्हणाले, ईडी ही स्वायत्त संस्था आहे. ईडी बाबत रस्त्यावर उतरुन आंदोलन करणे म्हणजे लोकशाहीच्या विरोधात काम करण्यासारखे आहे. अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न घातक आहे. एकनाथ खडसेंवर निशाणा साधताना दरेकर म्हणाले, खडसे म्हणाले होते, माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी काढतो, ते सध्या सीडी शोधत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

तर माझी चौकशी करावी

विरोधक बँकेसंदर्भात दरेकर यांची चौकशी करण्याची मागणी करत आहेत, यावर बोलताना ते म्हणाले, मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. मी चौकशीला घाबरत नाही. माझी तात्काळ चौकशी करावी.