राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार : भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जम्मू कश्मिरमधील कलम ३७० हटविल्याने जम्मू कश्मिरसह संपुर्ण देशातील जनता खूश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि अमित शहा यांच्या रणनितीमुळेच हे शक्य झाले आहे. महाराष्ट्रातही पाच वर्षांपुर्वी भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता उलथवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेचे जीवन सुखी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांतून निर्माण झालेल्या भाजपच्या नेतृत्वामुळे संपुर्ण जगामध्ये भारताचा दबदबा निर्माण झाला असून लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होईल, असा विश्‍वास भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज येथे व्यक्त केला.

पुणे जिल्हा आणि पश्‍चिम महाराष्ट्र भाजपच्यावतीने आज गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भाजपच्या बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख आणि पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होेते. याप्रसंगी ते बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री व्हि. सतिश, राज्यातील मंत्री सुभाष देशमुख, बाळा भेगडे, खासदार गिरीश बापट, संजय पाटील, अमर साबळे, यांच्यासह पुणे भाजपच्या अध्यक्ष माधुरी मिसाळ, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष लक्ष्मण जगताप, जिल्हाअध्यक्ष गणेश भेगडे, सर्व आमदार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह मोहीते पाटील, महापौर मुक्ता टिळक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

जे.पी. नड्डा म्हणाले, की मूळचे पश्‍चिम पाकिस्तानातील असलेले इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग हे पंतप्रधान तर लालकृष्ण आडवाणी हे देशाचे उपपंतप्रधान बनू शकले, परंतू कलम ३७० मुळे जम्मू- कश्मिरमधील मुळच्या गुज्जर, बकरवाल समाजाला आरक्षणाअभावी विधानसभा, लोकसभेत प्रतिनिधीत्व करता येत नव्हते. हे कलम हटविल्याने आता जम्मू कश्मिरच्या विधानसभेत आणि संसदेत या समाजाचे प्रतिनिधी दिसतील. कश्मिरच्या महिलांना बाहेरील राज्यात लग्न केल्यानंतरही मालमत्तेत अधिकार मिळणार आहे. आतापर्यंत देशातील बहुतांश कायदे तेथे लागू होत नव्हते, ते यापुढे लागू होतील. तीन तलाक बील मंजूर केल्याने मुस्लिम महिलांना न्याय मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहेत. भ्रष्टाचार कमी झाल्याने समाज सुखी जीवन जगत आहे. नुकतेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जागतिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर एक कोटी ४५ लाख कोटींची करसवलत जाहीर केली आहे. यामुळे हा पैसा अर्थचक्रात उपलब्ध होऊन नागरिकांची क्रयशक्ती वाढणार आहे, असे धाडसी निर्णय फक्त मोदीच घेऊ शकतात.

पाच वर्षापुर्वी महाराष्ट्राचे राजकारण भ्रष्टाचाराने बरबटलेले होते. घराणेशाही, सत्तेतून पैसा यामुळे भ्रष्टाचार बोकाळला होता. सरकार स्थिर नसल्याने राज्याची पिछेहाट झाली होती. परंतू फडणवीस यांच्या नेतृत्वाने शेती, शिक्षण, आरोग्य, परकिय गुंतवणुकीत राज्याला वरच्या स्थानावर आणले आहे. राज्य पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली पुन्हा सरकार आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

व्हि.सतिश म्हणाले, की पश्‍चिम महाराष्ट्र हा पुर्वी विरोधकांचा बालेकिल्ला होता. परंतू भाजपच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जावून पक्षाची विचारधारा रुजवल्याने आज हा भाग भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. भाजपने जोडतोडीचे राजकारण कधीच केले नाही. केवळ कामाच्या आणि विचारधारेच्या जोरावर राज्यकर्ते झालो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेले काम पुढील काळात आपल्याला जनतेसमोर न्यायचे आहे. यासाठी पुढील २८ दिवस कार्यकर्त्यांनी हिरीरीने नागरिकांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन सतिश यांनी केले.

शहरअध्यक्षा माधुरी मिसाळ म्हणाल्या, की देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ज्या भागात गेली, तेथील किल्लेदार भाजपमध्ये आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने मागील पाच वर्षांत केलेल्या कामांच्या जोरावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणण्यासाठी पुढील २८ दिवस आपण जोमाने कामाला लागू, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी गिरीश बापट यांचे भाषण झाले. शहर भाजपचे सरचिटणीस गणेश बीडकर यांनी सूत्रसंचालन केले.

Visit : policenama.com