50 % ही मतं राखू न शकणाऱ्या महाविकास आघाडीचे भविष्य काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमरिश पटेल हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले उमेदवार होते. मुंबई विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक संस्था निवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल यांचा विजय झाला. दरम्यान, महाविकास आघाडीची याठिकाणी ११५ मतं फुटल्याचं समोर आलं. महाविकास आघाडीच्या या पराभवावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करून जोरदार टीका केली आणि भाजपचे विजयी उमेदवार अमरिश पटेल यांचे अभिनंदन देखील केलं आहे. ते म्हणाले, “धुळे, नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महाविकास आघाडी आपली ५० टक्केही मत राखू शकली नाहीत. यावरुन उद्याचे महाविकास आघाडीचे भविष्य काय राहील हे स्पष्ट होते”,

अभिजीत पाटील भाजपमधून काँग्रेसमध्ये सामील झालेले उमेदवार होते. निवडणुकीत भाजपकडे १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ सदस्यांनी मतदान केले होते. तरीही भाजपचे उमेदवार अमरिश पटेल यांनी महाविकास आघाडीला मात दिली आहे. अभिजीत पाटील यांना केवळ ९८ मतं पडली. त्यामुळे क्रॉसवोटिंग झाल्याने निष्पन्न झाले आहे.

धुळे-नंदुरबारच्या निकालावरुन आता महाविकास आघाडीच्या ऐक्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. महाविकास आघाडीच्या याच पराभवाचा धागा पकडून भाजपकडून जोरदार हल्ला केला जात आहे. धुळे-नंदुरबारप्रमाणेच इतर मतदार संघातही भाजपचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.