भाजपकडून राज ठाकरे ‘टार्गेट’, केला ‘कोहिनूर मिल’वरून ‘घणाघात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. मनसे आणि भाजपमध्ये सोशलवर वॉर सुरू झाल्याचं दिसत आहे. निवडणुकीच्या कामाला सुरुवात होण्याआधीच भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टार्गेट केलं आहे.

भाजपने ट्विटरवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यासाठी भाजपने ‘रम्याचे डोस’ सुरु केले आहेत. रम्याने राज ठाकरे यांना कोट्याधीश जादूगार म्हणत हल्लाबोल केला आहे. कोहीनूर मिल घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. विरोधकांना डोस पाजण्यासाठी आणि त्यांच्यावर निशाणा साधण्यासाठी भाजपने ‘रम्याचे डोस’ सुरू केले आहेत.

भाजपनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “कृष्णकुंजवरच्या सायबांनी एकही रुपया न टाकता 20 कोटी काढून दाखवले. याला जादू म्हणतात.”

राज ठाकरेंनी केली होती मुख्यमंत्र्यांवर टीका
राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “राजभाषेच्या चाहुलीने सत्ताधारी थबकले, फक्त बातमीनेच थापाड्यांचे पाय लटपटले.” राज ठाकरेंच्या या ट्विटला उत्तर देत आता भाजपनं पलटवार केला आहे.

काय आहे रम्याचे डोस ?
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपनं सोशल मीडियावर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. रम्याचे डोस असं सदर त्यांनी सुरू केलं आहे. यासाठी भाजपने खास टीम बनवल्याचेही सू्त्रांनी सांगितले आहे. नव्या सदरातील रम्या हे पात्र आता भाजपांच्या विरोधकांना टार्गेट करणार आहे.

Visit : policenama.com