एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर रावसाहेब दानवेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath-khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra-fadanvis) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यामुळेच आपण पक्षत्याग करत असल्याचं खडसे यांनी सांगितले. तसेच त्यांनी एकटे फडणवीस पक्ष चालवतात असा गंभीर आरोपही केला होता. यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb-danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दानवे एका वृत्तवाहिनीशी प्रतिक्रिया देताना बोलत होते. दानवे म्हणाले की, भाजपामध्ये सामूहिक पद्धतीने निर्णय घेतले जातात. कोणतीही एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही. एकट्या देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष चालत नाही. मी प्रदेशाध्यक्ष असताना काही गोष्टी फडणवीसांना मान्य नव्हत्या, पण मी पटवून दिल्यावर त्यांनाही मान्य कराव्या लागल्या. त्यामुळे एकटे फडणवीस पक्ष चालवतात हा आरोप चुकीचा आहे.

उत्तर महाराष्ट्रात भाजपाकडे एकनाथ खडसे यांची उणीव भरुन काढणारे नेते आहेत. जळगावात आमच्याकडे रक्षा खडसे, सुरशे भोळे आणि गिरीश महाजन यांच्यासारखे नेते आहेत. नाशिक व अहमदनगरमध्येही आमच्याकडं सक्षम नेतृत्त्व आहे. त्यामुळे आम्हाला उत्तर महाराष्ट्राची चिंता वाटत नाही. आम्हाला चिंता आहे ती नाथाभाऊंनी पक्ष सोडल्याची, मात्र आता त्यांनी निर्णय घेतल्याने हा विषय संपल्याचे दानवे म्हणाले.