‘घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच ‘कोरोना’ होतो का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का असा सवाल भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विचारला आहे. राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आमच्या काळात मोबाईल नेहमी व्हायब्रेट करायचा. काही तरी मदतीचा एसएमएस यायचा असं म्हणत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

दानवे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, पण ते किती जिल्ह्यात गेले आणि आताचे मुख्यमंत्री किती ठिकाणी जाऊन आले. मला सांगू नका तुम्हीच विचार करा आणि आपापल्या गावात जाऊन सांगा. मी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, ग्रामीण, शहर सगळीकडे फिरलो. मुख्यमंत्री महोदय आम्ही म्हणतो घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी. एकट्यालाच खातो की काय कोरोना ? अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.

दरम्यान, याच मुद्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी एक ट्वीट करून पुरामुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री ठाकरे घराच्या बाहेर या आणि बघा महाराष्ट्रात काय चाललंय पण तुम्ही त्या बॉलीवूड आणि भिकारड्या राऊतच्या नादी लागला आहे. तुम्हीच तुमचं मुखपत्र सामना आणि तुमच्या PR एजन्सीला बंद करावं तरच आणि तरच तुम्हाला महाराष्ट्राची खरी परिस्थिती कळेल असं म्हटलं आहे.