निकालानंतर उमा भारतींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘तेजस्वी यादव चांगले व्यक्ती, बिहारचं नेतृत्व करू शकतात, परंतु…’
बिहार – वृत्तसंस्था – “तेजस्वी यादव हे एक चांगले व्यक्तिमत्त्व आहे. ते बिहारला चालवू शकतात. मात्र, थोडे मोठे झाल्यानंतर. त्यांच्याकडे राज्य चालवण्याचा कोणताही अनुभव नाही,” असे मत भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केलं. त्याचप्रमाणे उमा भारती यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे कौतुक केले.
बिहार विधानसभा निवडणूक आणि मध्य प्रदेशात पार पडलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमा भारती यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, “तेजस्वी यादव हे एक चांगले व्यक्ती आहेत. मात्र, सध्या ते राज्य चालवण्यास सक्षम नाहीत. राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा बिहारला जंगलराजमध्ये ढकललं असते. तेजस्वी हे नेतृत्व करू शकतात. पण थोडे मोठे झाल्यानंतर.”
“कमलनाथ यांनीसुद्धा निवडणूक चांगल्या प्रकारे लढवली. मात्र, त्यांनी यापूर्वी आपले सरकार योग्यरितीने चालवले असते तर आज या ठिकाणी एवढ्या समस्या निर्माण झाल्या नसत्या. ते एक चांगले व्यक्ती आहेत आणि माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनी निवडणूक खूप चलाखीने लढवली,” असे म्हणत त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे कौतुक केलं.
मुख्यमंत्री नितीश कुमारच !
बिहार विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत अखेर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) काठावरचे बहुमत मिळवले. आघाडीत सार्वधिक जागा मिळवून भाजप मोठा भाऊ बनला असला तरी आधी ठरवल्याप्रमाणे मुख्यमंत्रिपदाची धुरा नितीश कुमार यांच्याकडेच राहील, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिले. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हेच निवडणुकीच्या यशाचे गमक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.