२५० पेक्षा आधिक जागा जिंकून फडणवीस पुन्हा ‘मुख्यमंत्री’ बनणार : राजनाथ सिंह

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात पुन्हा एकदा फडणवीस सरकार येणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार असा विश्वास देशाचे संरक्षण मंत्री व भाजप नेते राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजप सेना युती कायम राहणार असून २५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या निर्धाराने कामाला लागा असे आवाहन केले आहे.

२५० पेक्षा जास्त जागा जिंकणार –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीतून महाजनादेश यात्रेला सुरुवात केली आहे. आज अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी मधून याचा प्रारंभ झाला. यावेळी फडणवीस यांच्या नेतृत्वाचे राजनाथ सिंह यांनी भरभरुन कौतूक केले. गेल्या विधानसभेला भाजप सेना दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते मात्र नंतर शिवसेनेबरोबर युती करण्यात आली, फडणवीस यांनी चांगल्या पद्धतीने युतीचे सरकार चालवले. यंदाच्या निवडणूकीला हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत आणि एकत्र विधानसभा निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे २०० प्लस नाही तर २५० पेक्षा आधिक जागा जिंकण्याचे आपले लक्ष असले पाहिजे, असे देखील राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

फडणवीस यांच्यावर भ्रष्टाराचा एकही डाग नाही. ते ज्या प्रकारे काम करतात त्यानुसार ते महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी मुख्यमंत्री असतील असे म्हणत राजनाथ सिंह यांनी फडणवीसांचे कौतूक केले. फडणवीस गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील जनतेेचा विश्वास जिंकला आणि आता पुढच्या ५ वर्षांत जनतेची मने ते जिंकतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारचे कौतूक –

यावेळी राजनाथ सिंह यांनी राज्य सरकारच्या कामाचे देखील कौतूक केले. राज्य सरकारने अनेक चांगल्या योजना राबवल्या, त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे. जो संकल्प घेऊन फडणवीस चालत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील एकही शेतकरी कर्जाच्या बोझ्याखाली राहणार नाही आणि शेतकरी आत्महत्या पूर्ण पणे थांबतील.

आरोग्यविषयक वृत्त