युतीनंतर दोन्ही पक्षात कही ख़ुशी कही गम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (सुरज शेंडगे ) – भाजप शिवसेना युतीची घोषणा मुंबईत करण्यात आली मात्र या घोषणे नंतर भाजप मध्ये ‘कही ख़ुशी कही गम’ असे चित्र पाहण्यास मिळते आहे. कारण शिवसेनेशी युती झाल्या नंतर भाजपचे काही पदाधिकारी नाराज झाल्याचे चित्र राज्यात दिसू लागले आहे. सत्तेत असणाऱ्या पक्षात बंडाळी हि अटळ असतेच असते. मात्र भाजप मधील बंडाळी उथळ असल्याचे काही घटनांमधून स्पष्ट दिसत आहे.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारी वरून शिवसेना नाराज आहे. सोमय्या यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांचे काम करणार नाही असे शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना स्पष्ट सांगितले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर पालघर शिवसेनेला सोडण्याची भाजपाची तयारी असल्याने त्या ठिकाणी भाजपचे स्थानिक पदाधिकारी नाराज आहेत. पालघर मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जागा शिवसेनेला सोडल्यामुळे राजीमाने दिल्याचे वृत्तदेखील समोर आले आहे. तर तिकडे भिवंडीच्या खासदारांना सुद्धा आपल्या खासदारकीची चिंता वाटू लागली आहे. कारण भिवंडीची जागा हि भाजप शिवसेनेला सोडण्याच्या तयारीत आहे.
भाजपपेक्षा शिवसेनेला या युतीचा फायदा अधिक झाला असून शिवसेनेचे खासदार आत्तापासूनच लोकसभेतील आपली जागा पक्की मानून चालले आहेत. शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, औरंगाबादचे खा चंद्रकांत खैरे, अमरावतीचे खा.आनंदराव अडसूळ, यवतमाळच्या खा. भावना गवळी, रामटेकचे खा. कृपाल तुमाने आदी शिवसेना खासदारांचे विजय या युतीने बऱ्याच अंशी पक्के केले आहेत. तर भाजपला मुंबई पुण्यात आणि महाराष्ट्राच्या काही ग्रामीण भागात शिवसेनेची तगडी मदत होणार आहे.