लोकांच्या जमिनी कवडीमोल भावाने रामदेव बाबाला विकल्या

नाना पटोलेंचा सत्याधाऱ्यांवर आरोप

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – सत्ताधाऱ्यांनी लोकांच्या जमिनी रामदेव बाबाला कवडीमोल भावाने विकल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केला आहे. नागपूर मध्ये आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. नागपूरमध्ये उद्योगधंदे आणल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मात्र त्यांनी केवळ इथल्या लोकांच्या जमिनी रामदेव बाबाला दिल्या. नागपूरमध्ये आलेले उद्योगधंदे सत्ताधाऱ्यांमुळे नाही तर काँग्रेसचे नेते विलास मुत्तेवार यांच्यामुळे आले असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले यांची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर भाजपचे मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना आर्शीर्वाद दिला होता. गडकरींच्या आर्शीर्वादाचे मी स्वागत करतो, ते माझे मोठे बंधू आहेत. त्यांच्या आर्शीर्वादाने मी ही निवडणूक जिंकेन आसा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपला रामराम ठोकल्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नितीन गडकरी म्हणाले होते की, नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून आशीर्वाद संपत नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, यावर पटोले यांनी आज उत्तर दिले आहे.

पटोले यांनी नागपुरातल्या रस्त्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पटोले म्हणाले की, सत्तधारी दावा करतात की, त्यांनी सिमेंटचे रस्ते बनवले, परंतु असा एक रस्ता दाखवा की जिथे लोकांच्या घरात पाणी शिरत नाही. नागपुरात काय कामं केली, त्याची गडकरींनी श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी पटोले यांनी मांडली आहे.