Keshav Upadhye :’3 नापासांनी मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्यांना हरवलं, पण…’; महाविकासमुळं दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे 10 वी अन् 12 वीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. कोरोनाच्या ताणाबरोबर बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही या तणावाखाली लाखो विद्यार्थी, पालक सामोरे जात आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारने तातडीने दहावी, बारावीच्या परिक्षेबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी (दि. 24) पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच 3 नापासांनी आपले मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवले आणि राज्यात सरकार स्थापन केले. पण अशी लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही. तेंव्हा राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू नये, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.

उपाध्ये म्हणाले की, राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे, हे जरी खरे असले तरी कोणत्याही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे दीर्घकालीन नुकसान होणार नाही, याची खबरदारी सरकारची आहे. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही राज्य सरकारने 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही. मुख्यमंत्र्यांना या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठीही वेळ नाही. मुळात ज्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या 3 तासात कोकणातला वादळ दौरा आटोपला त्या मुख्यमंत्र्यांना या परीक्षांचे महत्त्व आहे की नाही हा प्रश्न आहे. जर राज्य सरकार परिक्षा घेणार नसेल तर पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे याची स्पष्टता अजूनही सरकारने केलेली नाही. परीक्षा न घेण्याचा पर्याय सरकार निवडणार असेल ज्या-ज्या ठिकाणी 12 वीचे गुण ग्राह्य धरले जातात त्या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांचे काय? सरकारच्या या वेळखाऊ, धोरणामुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, याचे भान सरकारने ठेवावे, असे म्हटले आहे.