अमेरिकेच्या हिंसक आंदोलनात तिरंगा फडकवणारा काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा जवळचा मित्र; भाजप खासदार वरुण गांधी यांचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प( Donald Trump) यांच्या समर्थकांनी घालेल्या राड्यावरून आता भारतात काँग्रेस (Congress) आणि भाजपा (BJP) नेते एकमेकांना भिडले आहेत. भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi)  यांनी एक फोटो पोस्ट करत आरोप केला आहे की, ट्रम्प समर्थकांच्या हिंसेत जो व्यक्ती तिरंगा फडकवत आहे तो शशी थरूर यांच्या ओळखीचा आहे. मात्र शशी थरूर यांनी उत्तर देताना सांगितले आहे की, जर तो माणूस ओळखीचा असेल तर त्याच्या कृत्याचे मी समर्थन करत नाही, जर तुमच्या ओळखीचं कोणी काहीही करेल तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल का? असा सवालही शशी थरूर यांनी उपस्थित केला आहे.

गुरुवारी हजारोंच्या संख्येने डोनाल्ड ट्रम्प समर्थक कॅपिटल हिल येथे गोंधळ घातला. त्यानंतर सीनेटवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला. या हिंसक आंदोलनात 4 जणांचा मृत्यू झाला. या हजारो आंदोलकांच्या गर्दीत भारताचा तिरंगा झेंडा फडकताना दिसल्याने सध्या सोशल मीडियात चर्चेला उधाण आले आहे. फक्त वरुण गांधी आणि शशी थरूर यांनीच नव्हे तर अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही अमेरिकेत सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात तिरंगा फडकवणारा फोटो पाहून चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियात गुरुवारी हा व्हिडीओ चर्चेचा विषय राहिला आहे. यावरूनच आता भाजपाचे वरुण गांधी आणि काँग्रेसचे शशी थरूर यांच्यात ट्विटरवर वॉर रंगू लागले आहे.

भाजपा खासदार वरुण गांधी यांनी एक व्हिडीओ ट्विट करत म्हटलं की, कॅपिटल हिल हिंसक आंदोलनात भारताचा तिरंगा फडकताना दिसला, त्याठिकाणी भारतीय झेंडा का आहे? ही एक अशी लढाई आहे ज्यात भारताची कधीही त्यात भाग घेण्याची इच्छा नाही. वरुण गांधींच्या या ट्विटवर शशी थरूर यांनी उत्तर दिले आहे की, काही भारतीय डोनाल्ड ट्रम्प समर्थकांच्या मानसिकतेमध्ये आहेत. जे तिरंग्याचा सन्मान करण्याऐवजी एक हत्यार म्हणून त्याचा वापर करत आहेत. जे त्यांचे समर्थन करत नाहीत अशांना एंटी नॅशनल बोलल जाते. त्याठिकाणी दिसणारा झेंडा आपल्या सगळ्यांसाठीच एक इशारा आहे.

शशी थरूर यांच्या या ट्विटवरून पुन्हा वरुण गांधी यांनी म्हटले आहे की, आपली शान दाखवण्यासाठी तिरंगा फडकवणाऱ्या लोकांची खिल्ली उडवणे सध्या सोपे झाले आहे. त्याचसोबत चुकीच्या गोष्टींसाठी तिरंगा फडकवणेही सोपे झाले आहे. दुर्दैवाने काही पुरोगामी भारतीय भारतात एंटी नॅशनल आंदोलनात(जेएनयू) तिरंग्याचा वापर करण्याचा धोका दुर्लक्षित केला जातो. तिरंगा आमच्यासाठी गर्वाचे प्रतीक आहे, तिरंग्याचा सन्मान आम्ही कोणत्याही मानसिकतेशिवाय करतो असे वरूण गांधी यांनी सांगितले आहे.