ठाकरे सरकारचा ‘ तो ‘ डाव यशस्वी होऊ देणार नाही, आ. भातखळकर यांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक वर्षापासून बीडीडी चाळीत राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच परिसरात घरे मिळावे या करिता फडणवीस सरकारने पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला सुमारे 500 चौ. फुटाचे घर वरळी व नायगाव याच परिसरात मिळणार होते. परंतू आपल्या आवडीच्या बिल्डरला याचे काम मिळावे याकरिता ठाकरे सरकार कडून प्रकल्प सुरू करण्यास जाणीवपूर्वक उशीर केला जात असून येथील मराठी माणसाला मुंबई बाहेर पाठविण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका मुंबई भाजपा प्रभारी आमदार अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री बिल्डरांसोबत ‘अर्थपूर्ण संवाद’ करण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांना बीडीडी चाळीतील भाडेकरूंना घरे वितरित करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. मंत्र्यांना वेळ नसल्याचे कारण पुढे करत मागील वर्षभरात 3 वेळा वितरण प्रक्रिया रद्द केली आहे. तसेच, या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीला मागील वर्षभरापासून सरकारकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्यामुळे त्यांनी सुद्धा आता काम करण्यास असमर्थता दाखविली आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

…अन्यथा गृहमंत्र्याच्या घराला घेराव घालणार
केवळ वेळ नाही म्हणून मागील वर्षभरापासून घरांचे वितरण रखडवणाऱ्या गृहनिर्माण मंत्र्यांनी पुढील सात दिवसांत भाडेकरूंना घरे वितरित न केल्यास भारतीय जनता पक्षांकडून गृहनिर्माण मंत्र्यांच्या घरालाच घेराव घालण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला.

… तर त्यांचा प्रयत्न हाणून पाडूः आ. भातखळकर
एकीकडे बीडीडी चाळीची ही अवस्था असताना दुसरीकडे धारावीच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुद्धा जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला जात आहे.आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला काम मिळावे याकरिता मनोरा आमदार निवासाचे काम सुद्धा थातूरमातूर कारण देत नामांकित सरकारी कंपनीकडून काढून घेण्यात आले. केवळ फडणवीस सरकारने हाती घेतलेले हे प्रकल्प होते म्हणून हे महाविकास आघाडी सरकार अशा पद्धतीने निर्णय घेणार असेल तर त्यांचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू आणि मराठी माणसाच्या हक्काकरिता व बीडीडी चाळ व धारावीतील लाखो कुटुंबांना न्याय मिळवून देण्याकरिता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन उभारू असा इशाराच आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.