भाजपचा ‘हा’ नेता पुन्हा काँग्रेसच्या संपर्कात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मेगाभरती घेऊन अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात घेतले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन भाजपने स्वबळावर सत्तास्थापनेचा प्लॅन केला होता. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. तर निवडून आलेल्या नेत्यांपासून भाजप दूरावा ठेवत असल्याचे पहायला मिळत आहे.

राज्यात स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी आणि एक हाती सत्ता घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी नारायण राणे, मधुकर पिचड, गणेश नाईक, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, विजयसिंह मोहिते-पाटील, पद्मसिंह पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या नेत्यांना भाजपकडून फारसे महत्त्व मिळत नसल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेसमधून भाजपत आलेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची अती घाई केली. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राणे यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आपण सहकार्य करणार असल्याचे सांगत फडणवीस यांनी याची जबाबदारी आपल्यावर सोपवली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी सत्तास्थापनचे राणे यांचे वक्तव्य हे व्यक्तीगत असल्याचे सांगत त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला.

तर राधाकृष्ण विखे-पाटीलही भाजपच्या पत्रकार परिषदा किंवा इतर बैठकांमध्ये फारसे दिसत नाहीत. नगरमध्ये भाजपला यश मिळवून देण्याची वाल्गना त्यांनी केली होती. मात्र, त्यांना फारसे यश आले नाही. त्यामुळेच विखे पाटील यांच्यापासून भाजप अंतर ठवून आहे. विखे पाटील यांच्याप्रमाणेच मधुकर पिचड, गणेश नाईक, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, विजयसिंह मोहिते-पाटील हे दिग्गज नेते देखील भाजपच्या सोबत दिसत नाहीत.

Visit : Policenama.com