सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे भाजपचे धोरण : हर्षवर्धन पाटील

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन (विष्णू बुरगे) – लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रत्येक पक्षाचे स्टार प्रचारक राज्यातील लोकसभा मतदारसंघात जाऊन पक्षाचा प्रचार करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी लातूरमध्ये आले आहेत. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, आठ पंधरा दिवसात वातावरण बदलत चालले आहे. २०१४ ला मतांचे विभाजन झाले. यावेळी मतांचे विभाजन टाळण्यासाठी सर्व मित्रपक्षांना एकत्र घेतले आहे. त्याचा आम्हाला फायदा मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीला आम्ही दहा जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, ते आमच्याशी चर्चा करत राहिले आणि दुसरीकडे आपले उमेदवार देत राहिले. त्यांचा बोलवता धनी कोणी दुसरा आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. मतांच्या विभाजनासाठी त्यांना कोणी तरी सांगतय, ते त्यांचेच ऐकत आहेत. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

२०१४ मध्ये राज्यावर दोन लाख ८५ कोटीचे कर्ज होते. आता पाचशे पस्तीस कोटीचे कर्ज राज्यावर झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी राज्य कर्जबाजारी केल. भाजपचे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे धोरण असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थिती असताना देखील आजपर्य़ंत कोणत्याही उपाययोजना राबवल्या जात नाहीत. राज्य सरकारने मागील दोन महिन्यात दुष्काळावर बैठक घेतली नाही, हे कसले सरकार चालवत आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.