‘इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील प्रश्न मिटवा’, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाला रोखण्याासाठी बंद करण्यात आलेली राज्यातील मंदिरे उघडण्यात यावी आज भाजपनं आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान मंदिरं उघडण्याबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मंदिरं उघडण्याबाबत विचारणा केली होती. या पत्रात राज्यपालांनी हिंदुत्वाचाही उल्लेख केला होता. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला तुमच्याकडून हिंदुत्वाचे धडे घेण्याची गरज नाही असा टोला लगावला होता. यानंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी हिंदुत्वावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यात त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या एका जुन्या वक्तव्याचा फोटो ट्विट करत सीएम ठाकरेंना सवाल केला आहे. धर्मनिरपेक्षता संपलीये. आता भारताला हिंदूराष्ट्र घोषित करावं असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्या विधानाचा आधार घेत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. राणे म्हणतात, माननीय मुख्यमंत्री यालाही उत्तर देणार आहेत का ? की हे नेहमीप्रमाणे निव्वळ राजकारण आहे. इतरांना दोष देण्याआधी स्वत:च्या घरातील प्रश्न सोडवा असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

यापूर्वी आशिष शेलार यांनीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ट्विट केलं होतं आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात, “उद्धव ठाकरे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत शेजारी-शेजारी बसले आहेत. उद्धव ठाकरे यांनीच अयोध्येत रामाच्या मंदिराचं भूमीपूजन ई पद्धतीनं करा असा अनाहूत सल्ला दिला होता. भारत तेरे तुकडे हो हजार म्हणणाऱ्यांचं मुंबईत स्वागत केलं. त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते.”

“एवढंच नाही तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत यांनी केली. याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री ज्यांनी केले. पंढरपुरात जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्शही ज्यांनी केला नाही हे कसले हिंदुत्वाचे पुजारी ? हे तर सत्तेचे लाचारी !” अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती.