‘संशयित कोविड मृत्यू’ ही भानगड आहे तरी काय ?, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात आणि मुंबईत कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. दररोज कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. रुग्ण वाढत असताना मृतांची संख्या देखील वाढत आहे. रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यावर आरोप केले जात आहेत. विशेषत: मुंबईतील कोविड मृत्यूच्या आकडेवारीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप संपण्याचे नाव घेत नाहीत. मृत्यूच्या दाखल्यावर देण्यात येणाऱ्या संशयित कोविड मृत्यू (Suspected Covid) या शेऱ्यावरून आता विरोधकांनी मुंबई महापालिकेला घेरलं आहे.

भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. ‘संशयित कोविड’ मृत्यू या शेऱ्याचा नेमका अर्थ काय आहे, याचा योग्य तो खुलासा मुंबई महापालिकेने करायला हवा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. तसेच कोरोनाच्या मृत्यूचे आकडे लपवण्याचा हा हुकुमी मार्ग दिसतो आहे. संशयित कोविड असं लिहून अनेक मृत्यू आतापर्यंत लपवण्यात आले आहेत. हे सगळं करुन मुंबईतील मृत्यूचा दर घटल्याचे श्रेय महापालिका मोठ्या हुशारीने घेत आहे. मुंबई महापालिका म्हणजे पुरती ‘गोलमाल गँग’ आहे, असा घणाघाती आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये नुकतेच प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत मात्र भारतातील महानगरापैंकी केवळ मुंबई शहरातील कोरोनाचे खरे आकडे सांगितले जात असल्याचे म्हटले आहे. आमदार नितेश राणे यांनी वॉशिंग्टन पोस्टच्या या माहितीलाही आक्षेप घेतला आहे. या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना ही माहिती कोठून मिळाली की त्यांनी कार्यालयात बसूनच टेबल स्टोरी केली, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांनी आज नव्या मुद्यावरून महापालिकेला लक्ष्य केलं आहे.

दरम्यान, मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन लाखाच्या वर गेली आहे. कोरोना बाधित रुग्णांचे आकडे वाढत असताना मृत्यू दर कमी असल्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, विरोधकांनी यावर आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांकडून मृतांची आकडेवारी लपवण्यात येत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेकडं असल्याने इथल्या परिस्थितीवर विरोधकांचे विशेष लक्ष आहे. मुंबईतील मृतांची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप भाजपने यापूर्वी अनेकवेळा केला आहे.