26/11 Mumbai Attack : 26/11 च्या हल्ल्यात मारले गेले होते ‘या’ अभिनेत्याची बहीण आणि जिजू ! आठवण काढत झाला ‘भावुक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबर रोजीच्या आतंकवादी हल्ल्याला आज 12 वर्षे झाली आहेत. आज 12 वर्षांनंतरही ही घटना लोकांच्या मनात ताजी आहे. धमाल (Dhamaal) सिनेमातील अभिनेता आशिष चौधरी (Ashish Chaudhary) यानं 12 वर्षांपूर्वी झालेल्या या हल्ल्यात आपली बहीण जिजाजी यांना गमावलं होतं. आज त्यानं दीदी आणि जिजूंची आठवण काढत इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

आशिषनं त्याच्या इंस्टावरून बहिणीसोबतचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यानं एक इमोशनल नोट लिहिली आहे. यात तो लिहितो, माझा कोणताही दिवस तुझ्याशिवाय पूर्ण नाही होत मोना. मी तुझी आणि जिजूंची रोज आठवण काढतो. तुम्ही मला कायम पाहात राहा जसा मी तुम्हाला पाहात असतो. कारण तू आजही मला खूप हिंमत देतेस. तू आजही माझ्यासोबत आहेस. तुझ्या अस्तित्वामुळं मी श्वास घेतो.

आशिषनं एका वृत्तापत्रासोबत बोलताना सांगितलं होतं की, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर तो 40 दिवस डिप्रेशनमध्ये होता. तो काळ कुटुंबासाठी खूपच वाईट होता. त्या वेळी घरातील इतर लोकांवरही खूप वाईट प्रभाव पडला होता. त्यावेळी आशिष खूप लहान होता आणि त्याला असे दिवस पाहावे लागले.

आशिषनं सांगितल्यानुसार, त्याची बहीण मोनिका छाबरिया आणि जिजू अजित छाबरिया हल्ल्याच्या रात्री ट्रायडेंट हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये डिनर करत होते, जेव्हा आतंकवाद्यांनी फायरिंग केली होती. आशिष 48 तास हॉटेलच्या बाहेर उभा होता. दोन दिवसांनंतर कळालं की, त्याची बहीण आणि जिजू यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे.