‘त्या’ प्रकरणी ऋषी कपूर यांचा कंगना रणौतला ‘सपोर्ट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आहे. ‘जजमेंटल है क्या’ या सिनेमाच्या इव्हेंटमध्ये तिचा एका पत्रकाराशी वाद झाला. कंगनाने त्याच्यावर आरोप केले होते की, तो तिच्याबद्दल वाईट लिहितो आणि पसरवतो. यानंतर पत्रकारांच्या एका ग्रुपने तिला बॅन केलं. बॅन झाल्यानंतर तिने त्या ग्रुपवर हल्लाबोल केला. यानंतर आता कंगनाच्या समर्थनार्थ ऋषी कपूर पुढे आले आहेत. यावर त्यांनी आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना ऋषी कपूर म्हणाले, “मी कंगना रणौतचं समर्थन करतो. काही लोक काहीही लिहितात आणि याचा परिणाम असा होतो की, गंभीर पत्रकार वादात सापडतात. काही दिवसांपासून मीडियात अशा अफवा पसरत होत्या की, मी माझा आगामी सिनेमा ‘झूठा कही का’ च्या प्रोड्युसरवर नाराज आहे. मी कधी म्हटलं की, मी नाराज आहे ? मी किती महिन्यांपासून माझ्या देशातच नाहीये. माझं कोणाशी बोलणंही झालं नाहीये. हे अजिबात बरोबर नाहीये.”

यावेळी ऋषी कपूर यांनी आपल्या तब्येतीवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, “मी कॅन्सरपासून पूर्णपणे मुक्त झालो आहे. मी काही आठवड्यातच भारतात परत येईल. मला माझ्या घराची खूप आठवण येत आहे. एका सिनेमाच्या शुटींगदरम्यान पहिल्यांदा मला कळालं की, मला कॅन्सर आहे. चारच आठवड्यात माझं वजन तब्बल २६ किलोने कमी झालं होतं. आता माझं वजन ७-८ किलोने वाढले आहे.”

पुढे आनंदी होत ते म्हणाले की, “उपचार झाल्याच्या ६ आठवड्यानंतर माझं आयुष्य नॉर्मल होईल. मी माझ्या मर्जीने खाऊ शकतो, कोठेही फिरू शकतो, मुव्ही पाहू शकतो.”