औरंगाबादचं नाव बदलण्याची मागणी करणार्‍या भाजपवर बॉलिवूडच्या गायकाची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असं करण्याची मागणी केली आहे. त्यावर सुप्रसिद्ध गायक विशाल दादलानी याने जोरदार टीका केली आहे. ‘लोक तुम्हाला मूर्ख वाटतात का?’ असा प्रश्न दादलानी यानं केला आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या त्या शहराचं नाव बदलण्याचा मुद्दा गाजत आहे. औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असाच करणारी शिवसेना काँग्रेससोबत राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे भाजपचा शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने येत्या महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा त्याबरोबर औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा लावून धरला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मागील आठवड्यात औरंगाबादला गेले होते, तेव्हा त्यांनी नाव बदलण्याच्या मुद्द्यावर पुनरुच्चार केला होता. चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे व संभाजी राजांचे वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळं औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ असं नामकरण झालंच पाहिजे, असे म्हणाले. नाव बदलण्याच्या बाबतीत काही अडचणी आहेत त्या लवकरच दूर केल्या पाहिजेत असे पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर दादलानी यानं ट्विट केलं आहे. ‘पाच वर्षे तुम्ही सत्तेत होतात, तेव्हा नाव बदललं नाही. आता सत्तेपासून लांब झालात की काही महिन्यात नामांतर आठवलं. पुन्हा सर्कस सुरू झाली. काय साहेब? लोक तुम्हाला मूर्ख वाटतात का?,’ असं खोचक ट्विट दादलानी यांनी केलं आहे.