नाना पटोलेंनी PM मोदी अन् HM शहांची उडवली खिल्ली, म्हणाले – ‘ते विनामास्क फिरतात, त्यांनी कोणते इंजेक्शन घेतले?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सगळीकडे विनामास्क फिरतात त्यांनी कोणते इंजेक्शन घेतले माहीत नाही, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. तसेच जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी योग्यरित्या नियोजन करून आपल्या देशाला कोरोनामुक्त केले. पण आपल्या पंतप्रधानाकडे कोणतेही नियोजन नाही. त्यांनी लसी, ऑक्सिजन, आरोग्य सुविधा याचे नियोजन केले नसल्याची टीका पटोले यांनी केली आहे.

नाना पटोेले शनिवारी (दि. 24) पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पटोले म्हणाले, राज्य सरकार त्यांची जबाबदारी पाडत आहेत. मात्र मोदी सरकार काहीही करत नाही. तसेच राहुल गांधी, मनमोहन सिंग विरोधात असूनही केंद्र सरकारला कोरोना संदर्भात चांगले सल्ले देत आहेत. इथे महाराष्ट्रात मात्र भाजप मध्यरात्री दमणवरून रेमडेसिविर आणण्यात गुंतल्याची टीका पटोले यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर कारवाई होत आहे. पण ती करण्याची ही वेळ नाही. आता कोरोनाविरोधात लढायला हवे. पण तिथल्या चुका लक्षात येऊ नयेत, यासाठी जाणीवपूर्वक ही कारवाई केली जात असल्याचा आरोप पटोले यांननी केला आहे. लशींचे सगळे अधिकार त्यांनी स्वतःकडे ठेवले आहेत. केंद्राने भारताचा शत्रू देश असलेल्या पाकिस्तानला कोरोना लस फुकटात पुरवल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. दरम्यान केंद्राने देशातील प्रत्येक नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून द्यावी, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणारे निवेदन पटोले यांनी विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांना दिले आहे.