Coronavirus Impact : काय सांगता ! होय, मुंबई आणि पुणेकरांसाठी No Entry, मोठे दगड टाकून केले रस्ते बंद

पोलिसनामा ऑनलाईन टीम – वर्षानुवर्षे या हंगामात गावोगावी यात्रा, जत्रा, सण-समारंभासाठी पाहुण्यांची आतुरतेने वाट पाहणार्‍या नागरिकांनी आता हात वर केले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार कोल्हापूरमधील रस्त्यावर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे कोल्हापूरकरांनी मुंबईकर आणि पुणेकरांसाठी वाटा बंद केल्या आहेत. रस्त्यात मोठे दगड टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ गाव पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

कोराना व्हायरसमुळे कोल्हापूरमधील काही नागरिकांनी मुंबईकर आणि पुणेकर गावाकडे येउ नयेत यासाठी रस्त्यावर भले मोठे दगड टाकून रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे आता आपल्यांनीच नाकारले तर जायचे कुठे असा सवाल नागरिकांनी केला आहे. कोरोना व्हायरसचे संकट फैलावले असल्यामुळे अनेक राज्यामध्ये संचारबंदीसारखे कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण देशामध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

याच पार्श्वभूमिवर सगळ्या जिल्ह्यांच्या सीमादेखील सील करण्यात आल्या आहे. कोल्हापूरमध्ये तर नागरिकांनी रस्त्यावर मोठे दगड टाकून रस्ता बंद केला आहे. सगळे लोक सुट्ट्या लागल्या म्हणून गावी जाण्यासाठी निघाले आहेत अशात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंचनाळमधील गावात येणारे तीन रस्ते मोठे दगड टाकून रस्ते बंद करण्यात आले आहेत. बाहेरील व्यक्तीला गावात प्रवेश नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावकर्‍यांची खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील शिराळा आणि शाहूवाडी तालुक्याला जोडणारा पुलही बंद करण्यात आला आहे.