एकनाथ खडसेंच्या विरोधात ब्राम्हण समाज झाला आक्रमक, म्हणाले – ‘ते वादग्रस्त विधान मागे घ्यावं अन्यथा…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (ncp-eknath-khadse) यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra-fadanvis) यांच्यावर टीका करताना मी मुख्यमंत्रीपद ब्राह्मणाला दान केले, असे विधान केले होते. खडसेंच्या या वादग्रस्त विधानामुळे ब्राह्मण समाजाने आक्रमक (brahman-mahasangh-aggressive) भूमिका घेतली आहे. पुण्यातील ब्राह्मण महासंघाने खडसेंच्या विधानावर आक्षेप घेत त्यांनी तातडीने माफी मागावी, असे म्हटले आहे. खडसेंनी आपले विधान मागे घ्यावे अन्यथा पुण्यात आल्यानंतर त्यांना जाब विचारण्यात येईल. यासंदर्भात ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निवेदन दिले आहे. त्यामुळे खडसेंच्या वादग्रस्त विधानाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.

आनंद दवे म्हणाले, की एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका करताना ब्राह्मण समाजाबाबत जे वक्तव्य केले ते त्यांनी मागे घ्यावे, अन्यथा पुण्यात खडसेंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, त्यांच्या वक्तव्याचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत भोगावे लागतील, असे देखील दवेंनी म्हटले आहे. त्याचसोबतच दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी, हे खडसेंना ज्ञात नाही याचे आश्चर्य वाटते असे ते म्हणाले.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे ?
हा नाथाभाऊ दिलदार आहे. नाथाभाऊ तुम्ही आता घरी बसा मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे मला सांगितलं गेले. त्यावर मी म्हटले, की मी भल्याभल्यांना दान देतो. मग एका ब्राह्मणाला दान द्यायला काय हरकत आहे. तेव्हा मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले, एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला टाकले गेले. त्याच व्यक्तीमुळे सरकारचे वाटोळे झाले आहे, अशा लोकांमुळेच मला भाजपा सोडावा लागला असे खडसे म्हणाले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून खडसे हे फडणवीस यांच्यावर आक्रमकपणे टीका करत आहेत. मी संपूर्ण जीवन पक्षासाठी खर्च केले, एकनिष्ठ राहिलो. मात्र, मला एका माणसाने छळले असा आरोप त्यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे.